अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : गजानन सोमाणी एडिटर इन चीफ: देशात अलिकडच्या काळात विविध प्रकारच्या परिक्षांचा पेपरफुटीने देशभरातील युवा पिढीच्या भवितव्यावर मोठा प्रश्न चिन्ह निर्माण होवू लागला.आता काय होणार ? या विचारांच्या सातत्याने मनात खोलवर रुजलेली चीड/असंतोषाला नेमके नीट परीक्षेचा पेपरफुटीने युवक युवतीच्या असंतोषाचा भडका उडाला. देशात पहिल्यांदा पारंपारिक राजकारणापलीकडे जाऊन देशातील तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी या आंदोलनाचे नेतृत्व स्वतःच्या हातात घेतले आहे.

सोमवार २० जुलै २०२६ रोजी आंदोलकांचा संसद मार्चदरम्यान पोलिसांशी संघर्ष झाला. पोलिसांच्या लाठीचार्ज व अश्रुधुराच्या नळकांड्यांच्या वापरात अनेक जण जखमी झाले. पोलिसांनी मंच व तंबू हटवले तरी आज तिसऱ्या दिवशी देखील विद्यार्थ्यांनी तर मैदानात ठिय्या मांडला आहेच. पण पोलिसांची दडपशाही आणि सत्तेचा अहंकाराने देशभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी जंतर मंतरवर गोळा होत असल्याने शासन व प्रशासनाची हतबलता दिसून येत आहे.

पोलिसांनी आंदोलकांना अक्षरशः दहशतवाद्यी ठरवून केलेल्या कारवाईने सर्वसामान्य लोकांच्या मनात प्रचंड अस्वस्थता व असंतोष पसरला आहे. अशात आंदोलकांची गैरसोय होऊ नये म्हणून अगोदर दिल्लीतील नागरिकांकडून फक्त “जंतर मंतर” पत्ता लिहून ऑनलाइन फूड डिलिव्हरी व स्वयंसेवी संस्थांद्वारे आंदोलनकर्त्यांना अन्न व मदतीचा पुरवठा सुरू केला आणि आता देशाच्या कानाकोपऱ्यातून ऑनलाइन फूड डिलिव्हरी होऊ लागली आहे. जंतरमंतर नजीकच्या गुरुद्वारा व मज्जीद या धार्मिक स्थळांमध्ये आंदोलकांना रात्रीचा मुक्काम करून देण्यात येत आहे. देशभरातून विविध राजकीय व सामाजिक संघटनांकडून पाठिंबा दिला जातो आहे. मात्र आंदोलन हे कुठल्याही पक्षाचे नाही तर भविष्यातील प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी पुकारलेले आंदोलन आहे.यात जर कोणी राजकारण शोधत असेल तर येणाऱ्या काळात त्यांच्या पिढीलाच किंमत चुकवावी लागेल.

दिल्लीच्या जंतर मंतर येथील आंदोलनाकडे मानवी दृष्टिकोनातून पाहिल्यास, यात तरुणांचे तुडवलेले भविष्य, खाकी वर्दीचा कठोर बडगा आणि त्याविरुद्ध न जुमानता सर्वसामान्य माणसांच्या माणुसकीचे व संघर्षाचे दर्शन घडते. उपेक्षित तरुणाईचा अश्रूंचा बांध फुटला आहे. परीक्षांमधील सावळागोंधळ आणि अनिश्चिततेमुळे हवालदिल झालेल्या विद्यार्थ्यांचा आक्रोश हा केवळ राजकारणाचा विषय नसून तो तरुण पिढीच्या मानसिक व शारीरिक खच्चीकरणाचा मानवीय प्रश्न आहे. संवादाचा अभाव हा कळीचा मुद्दा ठरला आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांवर प्रशासनाने संवादाचा मार्ग अवलंबणे गरजेचे होते. पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही ना! ऐन पावसात व उन्हात भरमसाठ सुरक्षा आणि दमनशाहीचा बडगा उगारणे मानवी अधिकारांना गगनाला भिडणारे वेदनादायक ठरते. पोलीस प्रशासनाच्या विरोधात आणि कडक उन्हातही रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांसाठी देशाच्या कानाकोपऱ्यात स्विगी-झोमॅटो आणि स्वयंसेवी संस्थांद्वारे विनाओळख, केवळ भुकेल्यांसाठी अन्न व पाण्याचा पुरवठा केला जात आहे, हे मानवी संवेदनेचे जिवंत उदाहरण आहे










हे सर्व फोटो सोशल मीडिया आणि फेसबुकवर व्हायरल होत असून, ते तटस्थपणे पाहिलं तर समोर काय वाढून ठेवले आहे. हे सहज लक्षात येते. सूरी सोन्याची असली तरीही ती भाजी कापण्यासाठीच आहे.पोटात खूपसून घेणारं नाही ना ! धर्म लोकांसाठी आहे. लोक धर्मसाठी नाही तसेच देश लोकांसाठी आहे.देशासाठी लोक नाही.