अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे आणि शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना लोकशाहीचे महत्त्व कळावे, त्यांच्यात नेतृत्व गुणांची रुजवणूक व्हावी तसेच समाज सेवेबद्दल त्यांच्यात आवड निर्माण व्हावी, ह्या हेतूने प्रभात किड्स स्कूलमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी मंडळ निर्वाचित केले असून नवनियुक्त विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाचा शपथविधी सोहळा प्रभात किड्स स्कूलच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला.

सुरुवातीला शाळेच्या एनसीसीच्या कॅडेट्सनी सर्व विद्यार्थी संसद सदस्यांना सन्मानपूर्वक सभा मंचावर आणले. प्रभातच्या प्राचार्य वृषाली वाघमारे यांनी नवनिर्वाचित विद्यार्थी प्रतिनिधींना पदाची शपथ दिली. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य अर्चना बेलसरे, व्यवस्थापक अभिजीत जोशी, समन्वयक मो. आसिफ प्रामुख्याने उपस्थित होते. स्कूल हेड बॉय म्हणून ऋतुराज गावंडे याने पदाची शपथ घेतली तर हेड गर्ल म्हणून वंशिका लिलवानी हिने पदाची शपथ घेतली. तसेच आदित्य मंत्री असिस्टंट हेड बॉय तर याग्नी परिका हिने असिस्टंट हेड गर्ल म्हणून शपथ घेतली. या विद्यार्थी प्रतिनिधी मंडळातील सदस्य वत्सल देहानकर, उत्कर्ष देशपांडे, शंतनू तपासे, सनी ढवळे, सिद्धांत कोहळे, रिया कवडकार, नील अंभोरे, कृष्णा तिजारे, अनय बाच्छुका, वरूण मुंदडा, दर्श रामाणी यांना त्यांच्या पदांची शपथ देण्यात आली. सोबतच शाळेतील चारही हाऊस कॅप्टन तथा व्हाइस कॅप्टन पदासाठी निवड झालेल्या गार्गी शिंदे, आहिल शेख, यश महाजन, शर्वरी लहरीया, अद्वैता उजाडे, श्रेयस बदरखे, मैथिली गढीकर व मानस अंधारे यांना त्यांच्या पदाची शपथ देण्यात आली.

आजचा विद्यार्थी उद्याचा सुजाण नागरिक असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीची मूल्ये रुजविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्राचार्य वृषाली वाघमारे यांनी केले. विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा निकोप विकास साध्य होणार असून त्यांच्यामध्ये स्वयं-शासनाची गोडी निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, संचालिका वंदना नारे, सचिव निरज आवंडेकर, शिल्पा आवंडेकर, ज्येष्ठ रंगकर्मी व संचालक मंडळ सदस्य अशोक ढेरे यांच्यासह पालकवर्ग उपस्थित होता. अत्यंत शिस्तबद्ध रितीने पार पडलेल्या या सोहळ्याचे प्रास्ताविक उपप्राचार्य अर्चना बेलसरे यांनी केले.
निवड प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा, मुलाखत व त्यानंतर त्याचे उत्कृष्ट सादरीकरण दिले तर तज्ज्ञ परीक्षकांनी अत्यंत चोख परीक्षण करून प्रतिनिधींची निवड केली. संचालन गायत्री मोरे व सायली पाठक यांनी केले. तर आभार प्रदर्शन सोहम पोरे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदकिशोर डंबाळे यांच्या संयोजनात सामाजिक शास्त्र विभाग प्रमुख राहुल निलटकर, स्मिता जुमळे, गजानन बाठे, फरीदा अली, दिनेश पाटील, आशिष बेलोकार, समीर कुलकर्णी, अतुल डोंगरे, सागर पारेकर, पंकज देशमुख, दिनेश आगाशे, सचिन मुरुमकार व श्रीकांत बुलबुले यांनी अथक परिश्रम घेतले.