अकोला दिव्य न्यूज : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कार्यरत स्थायी चौकीदाराने सुरक्षा पर्यवेक्षकाविरोधात केलेल्या गंभीर तक्रारीमुळे विद्यापीठ परिसरात खळबळ उडाली आहे. मानसिक व शारीरिक छळ, जातिवाचक अपमान, धमक्या आणि जीवितास धोका निर्माण केल्याचे गंभीर आरोप या तक्रारीत करण्यात आले आहेत.

तक्रारदार राजू रुपाजी इंगळे यांनी कुलसचिवांकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की सुरक्षा पर्यवेक्षकांकडून गेल्या काही काळापासून सातत्याने त्रास दिला जात आहे.सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद वागणूक, शिवीगाळ, मारहाण तसेच दबाव टाकण्याचे प्रकार घडत आहेत. सततच्या छळामुळे कामाच्या ठिकाणी भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून जीवितासही धोका असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
तक्रारदाराने यापूर्वीही अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी केल्याचे नमूद केले आहे. मात्र, अद्याप ठोस कारवाई केली नसल्याने छळ वाढत असल्याचा आरोप केला आहे.यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणाची तात्काळ, निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. अन्यथा, येत्या १ मे २०२६ रोजी ‘महाराष्ट्र व कामगार दिना’निमित्त विद्यापीठ परिसरात आत्मदहन करणार असल्याचाचा इशाराही देण्यात आला आहे. प्रकारामुळे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा व सन्मानाचा मुद्दा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी सर्वत्र मागणी होत आहे.
