अकोला दिव्य न्यूज : विद्या भारती विदर्भ प्रांताच्या माजी प्रांत शिशुवाटिका प्रमुख सुनीता बल्लाळ यांचे आज १ सप्टेंबर रोजी नाशिक येथे कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती शशांक बल्लाळ, दोन मुली, जावई आणि नातवंडांसह मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या निधनाने विद्या भारती परिवारात शोककळा पसरली आहे.

विद्या भारतीच्या कार्यात दीर्घकाळ समर्पित भावनेने बल्लाळ यांनी योगदान दिले. शिशु शिक्षा व बालिका शिक्षा या विषयांवर त्यांचे सखोल व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन लाभत असे. प्रामाणिकपणा, मनमिळावू स्वभाव, कार्याची स्पष्टता आणि मातृहृदयी आपुलकी हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष गुण होते.अनेक कार्यकर्त्यांसाठी त्या मातृतुल्य मार्गदर्शक होत्या. त्यांच्या निधनाने विद्या भारती परिवाराने एक अभ्यासू मार्गदर्शक, समर्पित कार्यकर्ती आणि आत्मीय व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या कार्याच्या व मार्गदर्शनाच्या आठवणी सदैव स्मरणात राहतील.
