अकोला दिव्य न्यूज : अकोला जिल्हा कारागृहात लागोपाठ दोन विचाराधीन कैद्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे कारागृह परिसर आणि शहरात एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणांमध्ये दोन्ही मृतक कैद्यांचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या दोनपैकी एक कैदी तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील रहिवासी दीपक रामदास चातारकर (४२) आहे.

तेल्हारा न्यायालयाने शुक्रवार २२ एप्रिल रोजी एका खून प्रकरणात दीपक चातारकर याला तुरुंगात टाकले होते. सोमवार, २५ मे रोजी रात्री त्यांची प्रकृती अचानक खालावली. तुरुंग प्रशासनाने त्याला तात्काळ अकोला येथील सर्वोपचर रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचे निधन झाले.
चातारकर यांच्या मृत्यू होण्याच्या घटनेची शाई वाळत नाही तोच मंगळवार, २६ मे रोजी रात्री, बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव येथील रहिवासी प्रल्हाद पांडुरंग रायपुरे (६६) यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना देखील उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचे निधन झाले. रायपुरे यांना बुलढाणा जिल्हा सत्र न्यायालयाने २९ जानेवारी रोजी कलम ३०२ अन्वये तुरुंगात टाकले होते. लागोपाठ दोन दिवसात दोन कैद्यांच्या मृत्यूमुळे जिल्हा कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे.पोलीस दोन्ही प्रकरणांचा तपास करत आहेत.

११ वर्षांपूर्वी म्हणजे मार्च २०१५ मध्ये अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ४ कच्चा कैद्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. यात अकोला येथील मोहता मिल मरघट भागातील रहिवासी फारूक रशीद पठाण (२९) याला अटक करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर सदर आरोपीची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती. तेव्हापासून फारुख कारागृहात होता. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी फारुख पठाणची पत्नी शाइस्ता यांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. यापूर्वी वाशिम जिल्हय़ातील मानोरा येथील राठोड, बाळापूर येथील गुलाम जाफर व शेख साजिद शेख सुलतान या कैद्याचा मृत्यू झाला होता.

