गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : राजधानी दिल्लीतील बॉम्ब स्फोट हे गुप्तहेर यंत्रणांचे ढळढळीत अपयश असून ते दिवसागणिक वाढतेच आहे. आपल्या या यंत्रणांना ना कारगिलचा सुगावा लागला ना पठाणकोट, उरी, पुलवामा ना अगदी अलीकडील पहलगामातील दहशतवादी हल्ल्यांचा. हे असे होते. पण ते मान्य करण्याचा उमदेपणा केंद्रीय नेतृत्वाकडे नसल्याने हे सर्व नाकारले जाते. प्रचंड आकाराच्या आपल्या देशास १०० टक्के असे सुरक्षित राखता येणे केवळ अशक्य. कितीही शौर्याचा आव आणला तरी असे काही दहशतवादी हल्ले थांबवता येणे नाही, याची जाणीव सत्ताधीशांस आता झाली असेलच. पण खरा प्रश्न की तो विद्यमान सत्ताधीशांच्या भूतकाळाचा आहे.

काँग्रेस सत्तेवर होती आणि विद्यमान सत्ताधारी तेव्हा विरोधक होते. त्या वेळच्या विरोधकांनी त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांस तेव्हा घडलेल्या दहशतवादी हल्ल्यांसाठी नुसते जबाबदारच धरले असे नाही; तर त्यांची असभ्य निर्भर्त्सना केली. एवढेच नव्हे तर आम्ही सत्तेवर आल्यास असं करू आणि तसं करू असे दावेही केले. आता ते सर्व अंगाशी येताना ‘‘विरोधकांनी दहशतवादी हल्ल्यांत राजकारण आणू नये’’ असा सल्ला देणे हा शहाजोगपणा झाला. मात्र त्या वेळी विरोधात असताना आज विद्यमान सत्ताधीशांनी दहशतवादी हल्ल्यांत त्या वेळी राजकारण आणले. त्याचं काय ? त्याची परतफेड आता विरोधक करत असतील तर ती विद्यमान सत्ताधीशांनी गोड मानून घ्यायला हवी ना ! शेवटी, जे पेरले जाते तेच उगवणार. यावरून राष्ट्रीय सुरक्षा वगैरे तेव्हाचे आणि आताचे यांत अजिबात फरक नाही, असा निष्कर्ष कोणी काढल्यास तो गैर ठरवता येणे अवघड.
छातीठोकी देशप्रेमी सत्तेवर आहेत म्हणजे देशाच्या सीमा आपोआपच सुरक्षित राहतील असे मानणे हा बावळटपणा झाला. अनेक शहाणे-सुरते देखील अशा छातीठोक घोषणेवर विचारशून्य दिसतात. तर दिल्लीतील बॉम्बस्फोटासारख्या घटना आजच्या सत्ताधारींना उघड पाडतात.पहलगाम येथील घटना कॉंग्रेसच्या सत्ताकाळात होऊन, आजच्या प्रमाणे जर ऑपरेशन सिंदूर कॉंग्रेस सरकारने केले असता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्याकडून मध्यस्थी झाली असती तर पाकिस्तानचे नाक कापण्याची संधी गमावल्याचा सूर एकवटून विरोधकांनी त्यास शेळपट, नामर्द इत्यादी ठरवले असते. हे खरे असले तरी त्याची चर्चा आता करणे अयोग्य.

ऑपरेशन सिंदूर मध्ये आपल्या तलवारी अचानक कशा म्यान झाल्या ते साऱ्या देशाने पाहिले. तेव्हा मुद्दा त्या वेळचा किंवा कॉंग्रेस नाही. तो आताच्या दिल्ली बॉम्बस्फोटाचा आहे. हे देशांतर्गत घटकांनीच घडवलेले आहेत. त्यामागे सीमेपलीकडील कारस्थान नाही, असे प्रमाणपत्र देण्याची अजिबात गरज नसली तरी या बॉम्बस्फोटांचे पाप पाकिस्तानच्या माथी मारता येणार काय? या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असेल तर त्याचा प्रतिवाद कसा करणार हा प्रश्न ? यासाठी पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक वगैरेचा मार्ग या वेळी निवडल्यास त्यास आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा मिळेल का? कारण दिल्ली म्हणजे पहलगाम वा पुलवामा नाही. हे दोन्ही भाग सीमेवरील. तेथील दहशतवादी हल्ल्यांसाठी पाकिस्तानला जबाबदार ठरवता येईल. परंतु देशाच्या राजधानी दिल्लीत केंद्र सरकारच्या नाकाखाली दहशतवादी हल्ला झाला असेल तर त्यासाठी अन्य देशास जबाबदार धरता येईल काय?

आधीच्या हल्ल्यातील आरोपी/ संशयित दहशतवादी हे थेट पाकिस्तानी होते वा त्यांचे पाकिस्तानशी काही ना काही संबंधही होते; आताच्या दिल्ली स्फोटासाठी जबाबदार असणाऱ्यांचेही संबंध नसतील असे नाही. परंतु हा स्फोट घडवून आणणारे हे सर्व भारतीय आहेत. त्यात परत डॉक्टरांसारखे विशेष गुणवानही आहेत. म्हणजे हा बॉम्बस्फोट या स्थानिकांनी स्थानिकांच्या सहाय्याने घडवून आणला असावा ही शक्यता नाकारता येणे अवघड आहे. सत्ताबदल झाल्यानंतर असे हल्ले थांबतील असे दावे केले जात होते. परंतु उरी, पुलवामा, पहलगाम नंतर दिल्लीतील या बॉम्बस्फोटाने हा दावा खोटा पाडला. हे असे कृत्य शेवटचे ठरावे अशी इच्छा सर्वचीच सदिच्छा.तरी त्याची हमी देता येणार काय ?
मुद्दा असा की काही मोजक्या मुसलमानांच्या मनात जागी होणारी देशविरोधी भावना सत्ताबदलामुळे गेलेली नाही. फार फार तर ती कमी झाली असे मानता येईल. याचा अर्थ सत्ताबदल हे सर्व धार्मिक/ सामाजिक संघर्षबिंदूंस उत्तर नाही. म्हणजे विचार-धारणा बदल हा मुद्दा आला. तो करायचा तर देशविरोधी दहशतवादी कारवाया करण्याची भावना अशा काही मोजक्यांच्या मनी का तयार होते ? हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ! बदला/ सूड घेण्याचा पर्याय उपलब्ध असला तरी त्यामुळे मूळ समस्या सुटतेच असे नाही. उदाहरणार्थ इस्रायल. जगातील बलाढ्यांत गणली जाणारी या देशाची सुरक्षा यंत्रणा दहशतवादी हल्ला रोखू शकली नाही ती नाहीच; पण इतकी अचाट ताकद असूनही शंभरावर ओलिसांना हा देश जिवंत सोडवू शकला नाही. त्यामुळे ६०-६५ हजारांस ठार करून, वंशविच्छेदाच्या प्रयत्नानंतरही शेवटी इस्रायलला ‘हमास’शी तह करावा लागला.
इस्रायलचा आदर्श बाळगणाऱ्यांनी हा धडा दुर्लक्ष करू नये. शेवटी एकच की, हमास असो वा जैश असो किंवा इतर दहशतवादी संघटना असो, या केवळ फांद्या असून धार्मिक विद्वेष हा मूळ वृक्ष आहे आणि जोपर्यंत हा विद्वेषवृक्ष राजकीय गरजेच्या विष-पाण्यावर पोसला जातो आहे तोपर्यंत त्याच्या अशा कितीही फांद्या छाटल्या तर फरक पडणार ? शेवटी निसर्ग नियमानुसार आज जे उगवतं आहे ते भुतकाळ जे पेरल्या गेले आहे. असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.
