अकोला दिव्य न्यूज : राष्ट्रीय महामार्गावरील अकोला शहरानजिक चांदूर-बारलिंगा परिसरात असलेल्या रिलायन्स कंपनीच्या बॉटलिंग प्लांट परिसरात मंगळवारी रात्र उशिरा भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. अचानक उसळलेल्या आगीच्या प्रचंड ज्वाळा आणि आकाशाला भिडणारे धुराचे लोट पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर बचाव व नियंत्रण कार्य सुरू आहे.आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग पूर्णपणे आटोक्यात आल्यानंतरच नुकसानीचा अंदाज आणि घटनेमागील कारणे समोर येतील.

रात्री उशिरा कंपनीमधून अचानक धूर निघू लागल्यानंतर काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात उसळल्याने परिसरातील कामगार आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक बंबांसह जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. ताज्या वृत्तीनुसार आग आटोक्यात आणली असली तरी प्लॉंट मध्ये आगीची धग कायम आहे.
आगीची तीव्रता लक्षात घेता पोलीस प्रशासनानेही घटनास्थळी धाव घेत परिसरात सुरक्षा व्यवस्था केली. नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवण्यासाठी बंदोबस्त वाढविण्यात आला. आग इतर औद्योगिक युनिट्स किंवा परिसरातील भागात पसरू नये, यासाठी अग्निशमन दल विशेष दक्षता घेतली. आगीचे नेमके कारणही स्पष्ट झालेले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. आग पूर्णपणे आटोक्यात आल्यानंतर नुकसानाचा अंदाज आणि घटनेमागील कारणांची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. अग्निशमन दल, पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणा संयुक्तपणे कार्यरत असून आग नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले.
