तातडीने व्यवस्था सुचारू करा : निलेश देव यांची मागणी
अकोला दिव्य न्यूज : लोकांच्या जीवन मरणाशी निगडीत व पुढील कामांसाठी अत्यंत आवश्यक असलेली जन्म व मृत्यू नोंदणीसेवेचा बोजवारा उडाला आहे. भरीस भर म्हणून की काय गेल्या २५ मे २०२६ पासून ही सेवा पूर्णपणे ठप्प असल्याने लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. जन्म-मृत्यूची नोंदणी करण्यास केंद्र शासनाच्या अखत्यारितील पोर्टल बंद असल्याने अकोला महापालिका जन्म-मृत्यू विभागाचे कामकाज अक्षरशः खोळंबले असून जवळपास १ हजार ५०० हून अधिक जन्म व मृत्यू दाखल्याचे प्रकरणे प्रलंबित असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे गटनेते निलेश देव यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदन देत ठप्प पडलेली यंत्रणा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या मूलभूत हक्काशी संबंधित असलेली सेवा दीर्घकाळ बंद राहणे हे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
निलेश देव यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, २५ मेपूर्वी देखील जुन्या पोर्टलवर सातत्याने लॅगिंग, सर्व्हर डाऊन, डेटा अपलोड न होणे, माहिती सेव्ह न होणे अशा तांत्रिक अडचणी वारंवार निर्माण होत होत्या. त्यामुळे कर्मचारी व नागरिक दोघांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यानंतर नवीन एकात्मिक पोर्टल प्रणाली लागू करण्यात आली; मात्र एकाच पोर्टलमध्ये निर्माण झालेल्या गंभीर तांत्रिक बिघाडामुळे संपूर्ण जन्म-मृत्यू नोंदणी व्यवस्था ठप्प झाली आहे.
महानगरपालिका जन्म-मृत्यू विभागाने याबाबत एक-दोन वेळा संबंधित यंत्रणेकडे पत्रव्यवहार करून समस्या निदर्शनास आणून दिली असली तरी अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे. जन्म प्रमाणपत्राशिवाय शाळा प्रवेश, शासकीय योजना, आधार कार्ड, पासपोर्ट, बँकिंग व्यवहार यांसारखी अनेक कामे अडकली आहेत. मृत्यूच्या दाखल्या अभावी वारस नोंदणी, विमा दावे, बँक खात्यांशी संबंधित प्रक्रिया तसेच विविध कायदेशीर बाबी रखडल्या आहेत.
