अकोला दिव्य न्यूज : विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी भाजपतून आलेले माजी आमदार सिरस्कार यांना बाळापूर विधानसभा मतदार संघात उमेदवारी दिली आणि पराभूत होताच ते आपल्या सोईने परत भाजपवासी झाले. हा ताजा अनुभव पाठीशी असताना, होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत माजी आमदार बच्चू कडू यांना उमेदवारी देऊन पुन्हा तशीच चूक करून कट्टर ‘शिवसैनिक’वर अन्याय करू नये, असा मतप्रवाह शिवसेनेत दिसून येत आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला वेग आला असताना बच्चू कडू यांना उमेदवारी देण्याचा मुद्द्यावरून शिवसेनेचे राज्य समन्वयक रामेश्वर पवळ यांनी समाज माध्यमांवर एक चित्रफित प्रसारित करून शिवसैनिकांच्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाच्या कोट्यातून बच्चू कडू यांचे नाव चर्चेत येताच शिवसेनेतंर्गत तीव्र नाराजी पसरली असून पश्चिम विदर्भातूनच त्यांना विरोध केला जात आहे. कडू यांचा पक्ष स्वतंत्र असल्याने त्यांना आमदारकी दिल्याने विदर्भात शिवसेना वाढणार नाही, अशा शब्दात शिवसेनेचे राज्य समन्वयक रामेश्वर पवळ यांनी देखील नाराजी व्यक्त केली.

भाजपमधून आलेल्या सिरस्कार यांना निवडणूकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरभरून दिले.मात्र सिरस्कार अकार्यक्षम असल्याने तिसऱ्या क्रमांकावर घसरले. निवडणुकीत जय-पराजय होतच असतात. मात्र, पक्षनिष्ठा कायम ठेवायला नको का ? अवघ्या दोन महिन्यात पक्ष सोडून त्यांनी विश्वासघात केला. आरोप रामेश्वर समन्वयक रामेश्वर पवळ यांनी केला आहे.
सर्वसामान्य शिवसैनिक नेहमीच पक्षासाठी झटत असतो. त्यामुळे त्यांचा अधिकार हा पहिला असतो. त्यांच्या तोंडचा घास बाहेरच्या व्यक्तीला का द्यायचा ?. शिवसैनिक कुठला असो किंवा कुठल्याही जाती-धर्माचा असो त्यांना या पदावर काम करण्याची संधी दिल्या गेली पाहिजे. बच्चू कडू यांचा पक्ष आणि विचार स्वतंत्र असून बाहेरच्या व्यक्तीला एवढी मोठी जबाबदारी दिल्याने शिवसेना वाढणार नाही. खरं बघता या आमदारकीवर सगळ्यात अगोदर पहिला हक्क शिवसैनिकांचा असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा हक्क डावलणार नाही, असा विश्वास रामेश्वर पवळ यांनी व्यक्त केला आहे.

