अकोला दिव्य न्यूज : आज राम जन्मोत्सव म्हणजे रामनवमीच्या निमित्ताने राज राजेश्वर नगरीत सकाळपासून प्राचीन राम मंदिर, मोठे राम मंदिर आणि बिर्ला राम मंदिरांसह विविध भागांमधील राम मंदिर आणि घराघरात श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा होत आहे. गेल्या आठवड्यापासून मोठे राम मंदिरासह विविध राम मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम होत असून आज गुरुवार २६ मार्च रोजी सकाळी मोठ्या राम मंदिरात पुजा अर्चना करण्यात आली असून सायंकाळी ५ वाजता राजेश्वर मंदिरापासून काढण्यात येणाऱ्या भव्य शोभायात्रेत ७० हून अधिक भजनी मंडळे, वारकरी दिंडी आणि १०० हून अधिक भव्य व आकर्षक चित्ररथ सहभागी होणार आहेत.

हजारो महिला-पुरुष, युवक-युवतींसह रामभक्त व लोकप्रतिनिधी ‘जय श्री राम’ चा जयघोष करत या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. जुने शहरातील प्राचीन राजेश्वर मंदिर येथून निघणाऱ्या भव्य श्रीराम नवमी शोभायात्रेमुळे रामभक्त आणि भाविकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. स्व.गोवर्धन शर्मा यांनी लहान स्वरूपात सुरू केलेल्या या मिरवणुकीने ऐतिहासिक आणि विराटरूप घेतले आहे. लालाजी यांच्या मृत्यूनंतर श्रीराम नवमी शोभा यात्रा समिती आणि विश्व हिंदू परिषदेच्या स्वयंसेवकांनी दिवंगत शर्मा यांची परंपरा पुढे नेण्याचे प्रशंसनीय कार्य करीत असून त्यांच्या पुढाकाराने हजारो रामभक्त आणि लालाजींच्या चाहत्यांमध्ये नवचेतना निर्माण झाली आहे.

आकर्षक सजावट आणि प्रकाशयोजना. शहरातील सिटी कोतवाली चौकात प्रदर्शित केलेल्या चित्ररथांमध्ये, दिवंगत लालाजी यांचा लावलेला कटआऊट आकर्षणाचे केंद्र बनला आहे. मोठे राममंदिर, सिटी कोतवाली, महाराणा प्रताप चौक, कापड बाजारातील बियाणी चौक, जैन मंदिर, गांधी चौक आणि गांधी रोड भव्यदिव्य पद्धतीने सजवण्यात आले आहेत.रोषणाई व सजावटीने संपूर्ण परिसर राममय झाला आहे. हा अविस्मरणीय सोहळा यशस्वी करण्यात श्रीराम नवमी शोभायात्रा समितीचे स्थायी अध्यक्ष कृष्णा शर्मा महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

यावर्षीचे अध्यक्ष अरुण बालमुकुंद शर्मा, राजू मंजुलकर, राहुल राठी, बाळकृष्ण बिडवाई, अशोक गुप्ता, सुनील पसारी, संदीप वाणी तसेच विहीपचे सूरज भागेवार, गणेश कळसकर, प्रकाश घोगलिया आणि गिरिराज तिवारी, गिरीश जोशी, नवीन गुप्ता तसेच शहरातील विविध क्षेत्रातील समाजसेवकांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. श्रीराम नवमी उत्सव केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नाही तर, शहराची संस्कृती आणि परंपरा जिवंत ठेवण्याचे एक महत्त्वाचे माध्यम बनले आहे.
