अकोला दिव्य न्यूज : तब्बल 9 वर्षांनंतर झालेल्या अकोला महापालिका निवडणुकीत अकोला भाजपला एकुण 10 जागांचा तोटा सहन करावा लागत आहे. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत अकोला भाजपला बहुमतापेक्षा 7 जागा जास्त म्हणजे 48 जागा मिळाल्या होत्या. मात्र आज मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर भाजपने 44 जागांवर आघाडी घेतली. मात्र त्यांनतर मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात भाजपकडे अवघ्या 38 जागांवर आघाडी होती. अंतिम निकालात 38 जागांवर विजय मिळविला आहे.

भाजपची पिछेहाट होत असतानाच अजय शर्मा, सागर शेगोकार सारखे नगरसेवक पराभूत झाले. माजी उपमहापौर मापारी यांच्या पॅनलमधून भाजपचे दोन उमेदवार पराभूत झाले. राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच्या युतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगिता भरगड आणि भाजपचे अजय शर्मा पराभूत झाले. वंचितचे निलेश देव यांच्याकडून भाजपचे सागर शेगोकार यांना पराभव पत्करावा लागला.भाजपमधून निलंबीत नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी अपक्ष निवडणूक लढवत भाजप उमेदवाराचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. विशेष म्हणजे येथे अ,ब आणि क वर्गात 500 च्यावर मते नाटाला मिळाले आहे.
भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी 41 या काठावरच्या बहुमतासाठी सध्या तरी 3 नगरसेवक आवश्यक आहे. याकरिता शिवसेना काँग्रेसचे एक नगरसेवक उषा विरक (अजित पवार) यांना सोबत घेतले तरी दोन नगरसेवकांची गरज आहे. सुनील मेश्राम यांचा आघाडीला केवळ एक नगरसेवक मिळाला आहे. वर्ष २०१७ मध्ये स्वबळावर सत्ता केलेल्या भाजपला यंदा इतरांवर अवलंबून राहावे लागत आहे.

कॉंग्रेसने जोरदार मुसंडी मारत गतवेळी मिळालेल्या 13 जागांमध्ये तब्बल 8 जागांची वाढ करीत आपलं अस्तित्व दाखवून दिले आहे. कॉंग्रेसने तब्बल 21 जागांवर विजय खेचून आणला आहे. ओसोदीन ओविसी यांनी दोन सभा घेऊन देखील त्यांना अवघ्या 3 जागा मिळाल्या आहेत. एमआयएमने अकोट नगरपालिका मध्ये भाजप सोबत केलेल्या युतीचाच ओविसींना फटका बसला आहे. कॉंग्रेसची वोट बॅक अधिक मजबूत होऊन यंदा यामध्ये मोठी वाढ झाली आहे. वंचितने चांगले प्रदर्शन करीत 5 जागा काबीज केल्या आहेत.
भाजपसोबत युती सोडून जवळपास सगळ्याच जागा लढविणाऱ्या शिंदे यांच्या शिवसेनेचं पाणीपत झाले आहे. मतदारांनी नाममात्र 1 जागा दिली असून, विजयी झालेल्या उषा विरक कुठल्याही पक्षातून विजय मिळवल असता, त्यामुळे हा एकमात्र विजय देखील शिवसेनेचा नाही. असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. शिवसेनेच्या अनेक उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. अवघ्या चार जागेचा अपवाद वगळता शिवसेनेचे उमेदवार चार आकडीही मतदान घेऊ शकले नाहीत.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जंगी सभा होऊन ही शिवसेनेला अपयशाचे धनी का व्हावे लागले ? तिकीट वाटपापासून रूळावरून घसरलेली शिवसेनेची गाडी मतदानाचा दिवसांपर्यंत घसरलेली होती.
शिवसेनेपेक्षा उध्दव ठाकरे यांची शिवसेना कांकणभर सरस ठरली आहे.कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) सोबत युती करून मोजक्या जागांवर लढत देत 6 जागांवर उबाठाने विजय मिळवला आहे. एका प्रभागात उबाठा उमेदवाराच्या विरोधात जातीय समीकरणाने भाजपने दिलेल्या उमेदवारांने तुल्यबळ लढत दिली आणि दोघांच्या लढतीत अखेर कॉंग्रेस पक्षाचे तीन उमेदवार निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) शिंदेसेनेसोबत युती करून ही निवडणूक लढवली मात्र एकच जागेवर समाधान मानावे लागले आहे.
