अकोला दिव्य : गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : देशाचा सर्वांगीण विकास एक स्वाभाविक वा नैसर्गिक प्रक्रिया असून समाजाची प्रगती नेहमीच राजकीय प्रगतीच्या अगोदर येते. समाज सुधारणेच्या गर्भातच राजकीय प्रगतीचे बिजारोपण होते. समाजाने प्रगतीचा टप्पा पार केला की, देशाच्या विकासाचा वेग वाढतो.हे सुत्र लक्षात ठेवून इंग्रज अधिकारी सर विलियम बेटिक यांनी भारतातील सती प्रथेला गैरकायदेशीर घोषित केले. मात्र विधवा महिलांच्या परिस्थितीत यामुळे सुधार आला नाही.त्यांना मरेपर्यंत यातना सहन कराव्या लागत होत्या. समाज आणि कुटुंबामध्ये दळभ्रदी आणि अभागी समजल्या जात होते. विधवांच्या या दयनिय अवस्थेमध्ये बदल करण्यासाठी महाराष्ट्रात सर्वप्रथम वैदिक पध्दतीने विधवा विवाह करून देणारी पहिली व्यक्ती अकोला येथील वामनराव प्रभाकर आहे.

अकोला येथील महाविद्यालयात सहाय्यक शिक्षकाचे कार्य करणारे वामनराव प्रभाकर यांनी १५ जून १८६६ मध्ये मुंबई येथे मोरोबा कान्होबा यांच्या घरी विधवा पुनर्विवाह संपन्न केला. विशेष म्हणजे या पहिल्या विधवा विवाहातील वधू ही वामनराव प्रभाकर यांची स्वतःची बहिण होतो आणि जळगाव खान्देश जिल्ह्यातील सावदे येथे शिक्षक असलेले पांडूरंग विनायक करमरकर या लढ्याचे नवरदेव होते.
समाजात यामुळे क्रांतीची लहर निर्माण झाली. विधवा पुनर्विवाहाने समाजात दोन मतप्रवाह आमने-सामने आले. मात्र वामनराव प्रभाकर यांनी सामाजिक जागृतीची सुरुवात केली. या दरम्यान इंग्रजी शिक्षणाचा ही पगडा वाढत होता. इंग्रजी शिक्षण पद्धतीने जे काही थोडे बहुत फायदे मिळत होते, त्यामये सर्वात मुख्य म्हणजे तेथील राजकीय व्यवस्था पद्धत व महिलांना असणारे अधिकार याबाबतची माहिती मिळत होती. त्यामुळेच सती प्रथा, बाल विवाह, विधवा जीवन, घुंघट प्रथा आणि हुंडा यासारख्या अमानुष पद्धतीच्या विरोधात भारतातील समाजसुधारकांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आणि विधवा विवाहाची मुहूर्तमेढ झाली.

समाजातील अनिष्ट प्रथा हळूहळू का होईना मात्र या प्रथा समूळ नष्ट करण्याच्या विचाराने अकोलावासीयांनी २८ नोव्हेंबर १८९० मध्ये एक संस्था स्थापन केली. ‘व-हाड सामाजिक सुधारणा मंडळी’ या नावाने स्थापन झालेल्या या संस्थेचे पहिले अध्यक्ष रावबहादूर जठार होते. (अकोला शहरातील जठारपेठ लेआऊटचे मालक) वऱ्हाड सामाजिक सुधारणा मंडळी या संस्थेचे सदस्य त्यांनाच केल्या जाईल. जे संस्थेच्या सहा नियमांचे पालन करण्याचा प्रतिज्ञालेख लिहून देणार, असा ठराव संस्थेच्या पहिल्या सभेत मंजूर करुन घेवून एक नियम पत्रक पारित करण्यात आले होते.
• ११ सप्टेंबर २०१६ रोजी प्रसिद्ध झालेल्या आज इतवार मधून साभार