अकोला दिव्य न्यूज : पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यापूर्वी देशाला संघटित करण्याचे आणि इंग्रजांच्या अत्याचारातून मुक्त करण्याचे ऐतिहासिक काम केले. नेहरू हे नेहरू होते, त्यांच्या कर्तृत्वाची आणि देशाच्या इतिहासातील त्यागाची बरोबरी इतर कोणाशीही होऊ शकत नाही. त्यामुळे नेहरू आणि मोदी यांची तुलना करणे पूर्णपणे अशक्य आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुलनेवर वक्तव्य केले आहे. पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये आयोजित पदाधिकाऱ्यांच्या विशेष बैठकीत ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालत काँग्रेस, नेहरू आणि गांधी घराण्याच्या देशासाठीच्या ऐतिहासिक योगदानावर सविस्तर प्रकाश टाकला.
जाहिरातबाजीवरून टोला आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेचे कौतुक
सध्याच्या राजकीय जाहिरातबाजीवर जोरदार निशाना साधताना शरद पवार म्हणाले, “आज राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाची जाहिरात ‘टाईम्स ऑफ इंडिया’सह प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर झळकली आहे. अशा पहिल्या पानावरील जाहिरातींची किंमत किती अथांग असते, हे सर्वांना माहीत आहे. म्हणूनच आपण कधी त्या रस्त्याने गेलो नाही. मात्र, आजच्या कार्यक्रमाला झालेली कार्यकर्त्यांची विराट उपस्थिती हे स्पष्ट करते की, ही जाहिरात केवळ कागदावर मर्यादित राहिलेली नाही, तर ती सर्वांच्या मनामनात पोहोचली आहे.
सत्ता असो वा नसो, तुम्ही कार्यकर्त्यांनी त्याची कधीही चिंता केली नाही. अनेकांनी आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा काळ विरोधी पक्षात घालवला आहे. सत्ता असली की आपण सत्तेच्या माध्यमातून काम करतो, आणि सत्ता नसेल तर थेट लोकांमध्ये जाऊन काम करतो, हीच आपली खरी परंपरा आहे, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांच्या निष्ठेचे कौतुक केले.
पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा आणि नेहरूंशी तुलना
देशाच्या सद्यस्थितीवर चिंता व्यक्त करताना पवार म्हणाले की, आज सुशिक्षित बेरोजगार, आदिवासी, महिला आणि अल्पसंख्याक अशा विविध घटकांच्या समस्यांनी देशाला ग्रासले आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना या प्रश्नांवर किती आस्था आहे, यावर भाष्य न केलेलेच बरे. काही लोक सतत एकच गोष्ट सांगायचा प्रयत्न करत आहेत की या देशात असा एखादा नेता पूर्वी झालाच नाही.
