अकोला दिव्य न्यूज : शहरात अगदी शुल्लक कारणावरून सरळ खून करण्याच्या घटना वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण पसरले आहे.गुन्हेगारांवर पोलिसांचा दरारा संपल्यात जमा असल्याचे अलिकडच्या काळात लागोपाठ झालेल्या हत्याने हे अधोरेखित होते. गुन्हेगारीचा आलेख थांबायचे नाव घेत नसून शिवणी परिसरात वादातून २ युवकांनी एका युवकावर केलेल्या चाकू हल्ल्यात युवक ठार झाला.

शिवणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे राहणारा अभिषेक रविंद्र गवई (२०) आणि याच भागातील बहुजन नगर भागात राहणारा अयोग जिवन सावद (२०) तसेच राहुल नगरात राहणारा गणेश दयानंद सोनी (२०) यांच्यात वाद होता. या जुन्या वादातून अभिषेक रविंद्र गवई याच्यावर अयोग जिवन सावद आणि गणेश दयानंद सोनी या दोन युवकांनी चाकुने हल्ला करून गंभीर जखमी केले. परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात नेले मात्र याच दरम्यान त्याचा मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळताच
एमआयडिसी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्यास सांगितले. पो. नि. शंकर शेळके यांनी स्वतः सहकारी अधिकारी टिमसह घटनास्थळी भेट देवुन यातील आरोपीतांची सखोल माहीती काढुन स्था.गु.शा.अकोला चे २ पथक, पो.स्टे. एम.आय.डी. सी. चे एक पथक तयार करण्यात आले. पथकाला आरोपी हे रेल्वेने फरार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन पो नि शंकर शेळके हे स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकासह रेल्वे स्टेशन परिसरात पोहचले. आरोपी हे येणाऱ्या रेल्वे गाडीने पळून जाण्याच्या तयारीत होते.

पथकाने रेल्वे प्लॅटफॉर्मवर सापळा रचुन आरोपीचा शोध घेत असतांना आरोपी हे स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकास पाहुन पळुन चालत्या रेल्वे मध्ये बसण्याच्या तयारीत असतांना पो नि शंकर शेळके व त्यांच्या पथकाने आरोपीतांचा सिनेस्टाईल पाठलाग करून आरोपीतांना रेल्वेमध्ये बसण्यापुर्वीच जेरबंद केले.आरोपींना नमुद गुन्ह्या बाबत विचारपुस केली असता त्यांनी मृतकाचा खुन हा जुन्या भांडणाच्या कारणावरून केल्याचे सांगितले. अकोल्यात कोणत्याही प्रकारची पोलीसिंग राहिली नसल्याने दिवसेंदिवस गुन्हेगारांची हिम्मत वाढत चालली आहे. त्यातूनच राजरोस हत्या करण्याच्या घटना अकोल्यात घडत आहेत.
