अकोला दिव्य न्यूज : शेतकऱ्यांसाठी राज्य आणि केंद्र सरकार अनेक योजनांची घोषणा करते.अनेक वर्षांपासून हजारो कोटीच्या वेगवेगळया कामांना मंजूरी देते. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून बऱ्याच उपाययोजना आखल्या जातात परंतु शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची असलेली हमी भावाची मागणी याबद्दल कोणीच काही बोलत नाही.

कृषी उत्पादन वाढीसाठी लागणाऱ्या प्रत्येक वस्तु, मजुरीची किंमत दरवेळेस वाढत असते परंतु त्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या मालाला कधीच वाढीव भाव मिळत नाही त्याला आपला माल कमी किंमतीत विकावा लागतो. त्याला या बाबतीत कुठल्याही सरकारचे संरक्षण मिळत नाही. हमी भावाबद्दल कोणीच काही बोलत नाही. वर्षानुवर्षे शेतकरी घाट्यातच शेती करीत आहे. म्हणून आता सरकारने शेतकऱ्यांसाठी त्यांच्या प्रत्येक पिकाला हमी भावाची गॅरंटी द्यावी अशी मागणी पंजाबराव देशमुख त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित भारत कृषक समाज महाराष्ट्राच्या बैठकीत उपस्थित सदस्यांनी केली.
चेअरमन डॉ. प्रकाश मानकर यांनी याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, महसुल मंत्री व कृषी मंत्री यांना पाठवून त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. उपस्थित सदस्य शेषराव पाटील चिखलीकर, राजेन्द्र माहोरे, डॉ. सुधीश पाटील, डॉ. किरण ठाकरे, दिलीप पाटील, अनिल चतरकर, श्रीकृष्ण गावंडे, वासुदेव गावंडे, माधव भारसाकळे, सारंग बढे यांनी भाऊसाहेबांच्या फोटोला हार्रार्पण करून अभिवादन केले.
