अकोला दिव्य न्यूज : मुर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘अ वर्ग खरेदीदार’ परवानाधारक असलेल्या व्यवसायीकाने धान्य खरेदी व्यवहारात तब्बल १ कोटी ८४ लाख ९९ हजार ५६८ रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रितेश मडगे यांनी मुर्तिजापूर शहर पोलिसांत केली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर व्यापारी कुटुंबातील सदस्यांसह फरार असल्याची माहिती समोर आली असून संबंधित व्यापाऱ्यावर विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रीतेश शंकरराव मडगे यांनी मुर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, अलका अग्रवाल यांच्या नावावर ‘अ वर्ग खरेदीदार’ परवाना असून त्यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी करण्यात आली. सुनील अग्रवाल आणि केवल अग्रवाल हे सर्व व्यवहार हाताळत होते.असेही तक्रारीत नमूद आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्य खरेदीचा परवाना घेऊन खरेदीदाराने अडत्यांमार्फत शेतकऱ्यांकडून सोयाबीनसह इतर धान्याची खरेदी केली. मागील तीन महिन्यांत ८४२८.६६ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली असून, या व्यवहारातून बाजार समितीचे नियमानुसार आकारले जाणारे बाजार शुल्क (०.५ टक्के) आणि शासनाची देखरेख फी (०.५ टक्के) भरणे बंधनकारक असताना सदर खरेदीदाराने रक्कम भरण्याकरिता टाळाटाळ केली.
या खरेदी व्यवहाराची एकूण रक्कम सुमारे १ कोटी ७५ लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यावर आकारण्यात आलेले बाजार समितीचे व शासनाचे शुल्क तसेच काटा मापाई फी मिळून सुमारे ९ लाख ९९ हजार ५६८ रुपयांची थकबाकी असल्याचे तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे. जानेवारी २०२६ पर्यंत संबंधित व्यापाऱ्यांनी ही रक्कम अदा केली नसल्याने त्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या. मात्र, कंपनीकडून पैसे मिळाल्यानंतर सर्व रक्कम भरू, असे आश्वासन देत त्यांनी वेळकाढूपणा केल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलिसात तक्रार प्राप्त झाली. तथापि, हे प्रकरण एक कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याने ते आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करण्यात येईल.असे मुर्तिजापूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजित जाधव यांनी सांगितले.
