अकोला दिव्य न्यूज : अकोला शहरातील बेपत्ता अक्षय नागलकर प्रकरणातील रहस्य अखेर आज उघड झाले आहे. तब्बल तीन दिवसांपासून बेपत्ता असलेला अक्षय नागलकरला त्याच्याच आठ मित्रांनी निर्दयपणे जाळून ठार केल्याचं समोर आल्यावर शहरात एकच खळबळ उडाली आहे. जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी अत्यंत क्रूरपणे हत्या केली. एवढेच नव्हे तर मृतदेहाची अक्षरशः राख होईपर्यंत जाळण्यात आले.

अकोला शहरातील डाबकी रोड भागातील रहिवासी अक्षय नागलकर हा २२ ऑक्टोबरपासून बेपत्ता होता. त्याच्या कुटुंबीयांनी अकोला शहरातील डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिस यंत्रणा गेल्या तीन दिवसांपासून त्याचा शोध घेत होती. दरम्यान, काल रात्री अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे परिसरात एका टीनाच बखअक्षयला मारून जाळल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. या घटनेमुळे अकोला शहरात मोठा संताप उफानला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपींनी अक्षयला एका धाब्यावर जेवणासाठी बोलावलं आणि त्यानंतर त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले.

त्यानंतर आरोपींनी अक्षयचा मृतदेह शेतशिवारातील एका टीनच्या खोलीत नेऊन पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने जाळून टाकला. इतकंच नव्हे तर आरोपी मृतदेहाची राख पूर्णतः नष्ट होईपर्यंत तिथेच थांबले आणि नंतर ती राख गायब करून संपूर्ण टीनची खोली रंगवून टाकली. या प्रकरणात पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतलं असून आणखी चार आरोपींचा शोध सुरू आहे. या भीषण घटनेमुळे अकोला शहर हादरून गेलं आहे. रहस्यमय आणि क्रूर अशा दोन्ही शब्दांचा प्रत्यय देणाऱ्या या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
सध्या पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. मात्र या घटनेत सापडलेला मृतदेह अक्षयचाच आहे का, हा मोठा प्रश्नचिन्ह कायम आहे. अक्षयच्या कुटुंबीयांनी हा मृतदेह अक्षयचा नसल्याचं सांगितलं आहे तर या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा कुटुंबीयांनी केली आहे. या भीषण हत्याकांडानंतर पोलिसांसमोर तपासाचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. आरोपींचा हेतू, खुनामागचं कारण आणि मृतदेहाशी संबंधित सत्य हे सर्व उघड करण्यासाठी पोलिसांची कसोटी लागणार आहे.
