अकोला दिव्य न्यूज • सुबोध रणशेवरे याज कडून : महाराष्ट्र शासन आणि प्रशासनाचा कुठल्याही कारवाईचा वचक राहिला नसल्याने आरोग्य क्षेत्रातील अनागोंदी कारभारामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांची दररोज होणारी ससेहोलपट बघून सामान्य माणूस अक्षरशः हादरला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांतून केवळ मलिदा खाल्ला जातो आहे. शासकीय रुग्णालयाबद्दल न सांगितलेल बरं पण थोर मोठ्यांचा नावाने सुरू केलेल्या धर्मदाय रुग्णालय देखील सर्वसामान्य रुग्णांना ओरबाडून घेण्यात आता मागे नाहीत. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री आणि त्यांचं आरोग्य खात झोपेचं सोंग घेवून झोपलेले आहे. एवढे नक्कीच!.

अनामत रक्कम भरण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने वेळीच उपचार न झाल्याने पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, करदात्यांच्या पैशावर चालणाऱ्या आणि पंडित मदनमोहन मालवीय यांच्या नावाने असलेल्या शताब्दी या मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील गैरसोयींमुळे एका रुग्णाला प्राण गमवावा लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अविनाश शिरगावकर (४५) असे मृत रुग्णाचे नाव आहे.

चेंबूर-घाटला येथे राहणाऱ्या अविनाश शिरगावकर यांना सोमवारी सायंकाळी मूत्र विसर्जनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे भाऊ अरुण यांनी अविनाश यांना गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात नेले. मात्र, सर्जन उपस्थित नसल्याने रुग्णालय प्रशासनाने अविनाश आणि अरुण यांना सायन रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. दोन तास रखडल्यानंतर अविनाश यांना हा सल्ला देण्यात आला.

त्यामुळे त्यांची तब्येत आणखीनच बिघडली.”लघवी होत नसल्याने त्यांचे पोट गच्च भरले होते. त्याच अवस्थेत अविनाश यांना सायन रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथेही स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने त्यांना काही मजले पायी चढावे लागले. संबंधित विभागात गेल्यावर डॉक्टरच उपस्थित नसल्याने थोडा वेळ थांबावे लागेल, असे अविनाश यांना सांगण्यात आले. तिथेही बराच वेळ गेला. अखेरीस अविनाश यांनी रुग्णालयातच प्राण सोडले.

… तर जीव वाचला असता!
गोवंडी शताब्दी रुग्णालयात गेले अनेक महिन्यांपासून गैरसोय होत आहे. शताब्दी रुग्णालय सुसज्ज असते, तज्ज्ञ डॉक्टर तिथे वेळीच उपलब्ध असते, तर आम्हाला गोवंडी-सायन असे खेटे घालावे लागले नसते. या सगळ्या प्रक्रियेत वेळ गेला आणि भावाच्या जीवावर बेतले, अशी खंत अरुण शिरगावकर यांनी व्यक्त केली.
