Wednesday, March 12, 2025
HomeUncategorizedयंदा केजरीवालांचा 'हिशोब' कॉंग्रेसने चुकता केला !

यंदा केजरीवालांचा ‘हिशोब’ कॉंग्रेसने चुकता केला !

• गजानन सोमाणी एडिटर इन चीफ : एकेकाळी केंद्रात आणि दिल्लीत सत्ता असताना काही मुद्दे घेऊन सातत्याने उपोषण करणारे अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकाच्या मंजुरीसाठी दिल्लीतील रामलीला मैदानावर सुरू केलेल्या उपोषणात बेमालूमपणे इंडिया अगेंस्ट करप्शन या संस्थेची सांगड घालून, भ्रष्टाचाराच्या विरोधातील हे आंदोलन राष्ट्र-व्यापी जन-आंदोलन झाले. महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांना राजीनामे देण्यास भाग पाडणारे अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल, मेधा पाटेकर, किरण बेदी, कुमार विश्वास,मनिष सिसोदिया, संतोष हेगड़े, वरिष्ठ अधिवक्ता प्रशांत भूषणसोबत योग गुरू बाबा रामदेव आणि अनेक प्रतिष्ठित समाजसुधारक यांनी देशभरात रान पेटवले. जो तो मै भी अण्णा लिहिली टोपी घालून अन्ना हजारेंचा बाजूला आला. अण्णा हजारे प्रति महात्मा गांधी झाले आणि मॅग्सेसे पुरस्कार विजेता सामाजिक कार्यकर्ता अरविंद केजरीवाल यांना ‘इंक्बाल’ चा चेहरा दिला.

एकमात्र खरे की, हे आंदोलन स्वयंस्फूर्त नव्हते. विशिष्ट पध्दतीने प्रायोजित होते.अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली २०११ मध्ये सुरू झालेलं आंदोलन लोकपाल विधेयकाबाबत होते. मात्र नंतर हे विशिष्ट पध्दतीने प्रायोजित करण्यात आले.दरम्यान एक वोट बॅक (vote for India) सुरू केली. या वोट बॅंकेच्या सदस्यांना शपथ दिली की, ते कुठल्याही अशा राजकीय पक्षाला मतदान करणार नाही, की जो लोकपाल विधेयक मंजूर करणार नाही. हे आंदोलन एका अनोळखी व्यक्तीकडून ‘राजकीय पक्ष’ चा उदयासाठी मुहूर्तमेढ होती.अत्यंत चतुराईने न झालेल्या भ्रष्टाचाराचा बागुलबुवा उभा करून राजकारणाची दिशा बदलून टाकली.या आंदोलनाने अनेकांना सत्तेची चव चाखायला मिळाली, मिळत असून आज १२ वर्षांपासून त्यांच आंदोलनाच्या धगीत कॉंग्रेसला पोळून निघत आहे.

आज जाहीर झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निकालातून भाजपाचा २७ वर्षांपासूनचा राजकीय विजनवास संपला तब्बल ४८ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे.यासाठी भाजपाच अभिनंदन पण एका आंदोलनातून जन्माला आलेल्या आम आदमी पक्षाला सत्तेतून बाहेर खेचलं ते कॉंग्रेसनेच. कारण या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मागील निवडणुकी पेक्षा जास्त मते मिळाली आहे. कॉंग्रेस पक्षाने यंदा अत्यंत गंभीरपणे मात्र आक्रमक होत प्रचार केला. ज्या ज्या जागेवर कॉंग्रेस मजबूत होती. त्या जागेवरच आप पक्षाला मोठा दणका दिला.

एकेकाळी दिल्लीत सत्ता असणाऱ्या काँग्रेस पक्षाला सलग तिसऱ्यांदा भोपळाही फोडता आलेला नाही. मात्र उल्लेखनीय बाब म्हणजे काँग्रेसने स्वत:चा पराभव होत असताना आम आदमी पक्षाच्या अनेक नेत्यांचा पराभव घडवण्यात महत्त्वाची आणि निर्णायक भूमिका बजावली आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया यांच्यासह आपचे अनेक नेते निसटत्या फरकाने पराभूत झाले.हे निकालानंतर स्पष्ट होते. हा भाजप नेत्यांचा करिश्मा नाही.

लोकसभा निवडणुकीवेळी दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस हे इंडिया आघाडीच्या माध्यमातून एकत्र निवडणूक लढले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांची आघाडी झाली नव्हती. त्यामुळे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढल्याने दिल्लीतील काही जागांवर मतविभाजन झालं. तसेच या मतविभागणीचा मोठा फायदा भाजपाला झाला. दिल्लीतील अनेक मतदारसंघात काँग्रेसला मिळालेली मतं ही आपच्या पराभूत उमेदवारांच्या पराभवाच्या अंतरापेक्षा अधिक होती. त्यामुळे काही मतदारसंघा हे दोन्ही पक्ष एकत्र असते तर दिल्लीतील गणित बदललं असतं असे दावे केले जात आहेत.पण कॉंग्रेस पक्षाने ही भुमिका का घेतली हे देखील लक्षात घेणं आवश्यक नाही का !

दरम्यान, दिल्लीमध्ये काँग्रेसने उमेदवार दिल्याने मतविभाजन होऊन आम आदमी पक्षाच्या ज्या बड्या नेत्यांचा पराभव झाला त्यामधील पहिलं नाव आहे ते म्हणजे आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच. अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. येथे केजरीवाल यांच्यासमोर भाजपाचे प्रवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांचं आव्हान होतं. या लढतीत भाजपाच्या प्रवेश वर्मा यांनी आपच्या अरविंद केजरीवाल यांचा ४ हजार ८९ मतांनी पराभव केला. तर येथे काँग्रेसचे उमेदवार असलेल्या संदीप दीक्षित यांना ४ हजार ५६८ मतं मिळाली. केजरीवाल यांच्या पराभवात संदीप दीक्षित यांना मिळालेली मतं निर्णायक ठरली. आप आणि काँग्रेस एकत्र असते तर कदाचित इथे केजरीवाल जिंकले असते.

आम आदमी पक्षात केजरीवाल यांच्या खालोखाल महत्त्वपूर्ण नेते असलेल्या मनीष सिसोदिया यांना जंगपुरा विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या तरविंदर सिंह मारवाह यांच्याकडून अवघ्या ६७५ मतांनी पराभूत व्हावे लागले. येथे तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले काँग्रेसचे उमेदवार फरहाद सुरी यांना तब्बल ७ हजार ३५० मतं मिळाली. येथेही सिसोदिया यांच्या पराभवाच्या अंतरापेक्षा काँग्रेसला असलेल्या मतांची संख्या अधिक होती. मालवीयनगर मतदारसंघात आपचे सोमनाथ भारती यांना भाजपाच्या सतीष उपाध्याय यांच्याकडून २ हजार १३१ मतांनी पराभूत व्हावे लागले होते. येथेही काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र कुमार कोचर यांना ६ हजार ७७० मतं मिळाली.याशिवाय दिल्लीतील राजेंद्रनगर मतदारसंघात आपच्या दुर्गेश पाठक यांना भाजपाच्या उमंग बजाज यांच्याकडून अवघ्या १२३१ मतांनी पराभूत व्हावे लागले. येथेही काँग्रेसला ४ हजार १५ मतं मिळाली. मतविभाजन झालं नसतं तर कदाचित येथे आपचा उमेदवारा विजयी झाला असता.

तसेच आपचे सौरभ भारद्वाज यांना ग्रेटर कैलाश मतदारसंघात भाजपाच्या शीखा रॉय कडून ३ हजार १८८ मतांनी पराभूत व्हावे लागले.येथे काँग्रेस उमेदवाराला ६ हजार ७११ मतं मिळाली.येथेही मतविभाजनाचा फटका आम आदमी पक्षाला बसला. याबरोबरच आणखी काही मतदारसंघांमध्ये आम आदमी पक्षाच्या उमेदवारांच्या पराभवाच्या अंतरापेक्षा काँग्रेसच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची संख्या अधिक आहे. त्यामुळे तिथेही दोन्ही पक्ष एकत्र असते तर काही फरक पडण्याची शक्यता होती.पण कॉंग्रेसला या निवडणुकीत ही भुमिका घेणं आवश्यक होते. आंदोलनाच्या माध्यमातून कॉंग्रेस विरोधात वातावरण निर्माण करण्यात केजरीवाल हे सर्वात महत्वाचे घटक होते आणि प्रायोजित आंदोलनाने भाजपच्या हाती आयतं कोलीत मिळाले. तेव्हा दिल्लीत अस्तित्व टिकवून असलेल्या केजरीवाल यांना धडा शिकविण्यासाठी कॉंग्रेसने राजकीय दृष्टीने अत्यंत माफक भुमिका घेतली असून, कधी कधी राजकारणात पुढील काळाचे नियोजन करावे लागते. निश्चितच हे सामान्य माणसाला पटणारे नाही पण कॉंग्रेसने हिशोब चुकता केलाच!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!